एके दिवशी बिरबल काही दरबारात गेला नाही. अशी संधी पाहून त्याचा द्वेष करणारे पाच-सहा सरदार बिरबलाची बादशहाकडे निंदा करू लागले. मनामध्ये चिडलेला बादशहा त्यांना म्हणाला ‘या जगात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती ते मला सांगा?’
यावर कोणी महाराज, कोणी देव, कोणी ईश्वर, कोणी हवा-पाणी तर कोणी अन्न अशा प्रकारची उत्तरे दिली. पण बादशहाचे समाधान झाले नाही.
तेव्हा तो रागातच म्हणाला-बिरबलापेक्षा आपण कशातही कमी नाही असे तुम्ही म्हणाला ना? तर मग माझं समाधान होईल असे उत्तर येत्या दोन दिवसान तुम्ही मला द्या. नाहीतर तुमची वतनं आणि सरदारची पद काढून घेईन.
दरबार संपताच ते सरदार बिरबलाकडे गेले. त्याच्यासमोर हात जोडून आणि बादशहाने सांगितलेला प्रश्न ऐकवून ते त्याला म्हणाले-‘बिरबलजी, झाले गेले विसरून आम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगा व आमची पदे तसेच वतने वाचवा.’
बिरबल म्हणाला- ‘मी आहे आजारी. मला काही चालवत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या खांद्यावर बसवून मला दरबारात न्या, आणि मी स्वतः तुमच्यातर्फे महाराजांना प्रश्नाचे उत्तर देईन व तुमची पदे व वतने वाचवीन.’
सरदारांनी हे मान्य केले. बिरबलाला खांद्यावर घेऊन दुसऱ्या दिवशी ने सरदार जेव्हा दरबारात पोहचले तेव्हा आश्चर्यचकित झालेला बादशहा म्हणाला-बिरबल, जे सरदार तुला पाण्यात पाहातात. तेच तुला खांद्यावर घेवून दरबारात येतात.
बिरबल म्हणाला- ‘आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यातर्फे मी द्यावे आणि त्यांची वतने आणि सरदारक्या वाचवाव्यात म्हणून ते मला खांद्यावर बसवून घेऊन आले.’
बादशहा- ‘त्याच्या खांद्यावर बसून येण्यात तुझा उद्देश्य काय?’
बिरबल-महाराज, या जगात स्वार्थ हीच गोष्ट सर्वात महत्वाची आहे. हे सिद्ध करून दाखवण्यासाठी मी त्यांना, ‘मला खांद्यावर बसवून दरबारात घेऊन गेलात तरच मी तुमच्यातर्फे महाराजांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देईन असे सांगितले व त्यांनी आपल्या सरदारक्या व वतने वाचवण्यासाठी लाचारीने मान्य करून मला खांद्यावर बसवून आपल्याकडे आणले.’







